नैसर्गिक आपत्ती टाळणे अशक्य असले तरी त्यामुळे होणार्या नुकसानीची मात्रा कमी करता येऊ शकते. अनेक मानवनिर्मित आपत्ती टाळणे शक्य आहे. याकरिता गरज आहे ती सामाजिक प्रबोधनाची. आपत्तीप्रसंगी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरज असते ती मदत कार्याची. आर्थिक मदत राज्य किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते, मात्र प्रत्यक्ष कृतीसाठी गरज असते ती प्रचंड मनुष्यबळाची. यामध्ये युवकांचा सहभाग असला तर मदत कार्य अधिक तत्परतेने होऊ शकते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, अन्य सेवक व समाजातील प्रत्येक घटकांचा याकामी स्वयंप्रेरित सहभाग असावा, त्याकरिता त्यांना या विषयाचे वाचनांतूनच आकलन व्हावे यासाठी सदर पुस्तक तयार केले आहे. इंग्रजीत वा अन्य भाषांमध्ये याविषयी भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत, परंतु आपत्तीप्रसंगी नेमके काय करावे व काय करू नये याचे शास्त्रोक्त विश्लेषण या पुस्तकात मराठीमध्ये केलेले असल्याने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते सहज समजू शकेल. त्यामुळे हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकले तर त्याचा समाजाला अधिकच लाभ होईल.