"(अधुरे - मुस्लीम कथालू या तेलगू कथासंग्रहाचा मराठी अनुवाद )
मराठी मुस्लीम साहित्याचा एक क्षीण प्रवाह अस्तित्वात आहे. या प्रवाहाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, असं निरीक्षण. स्कैबाबांच्या ‘मुस्लीमवादी तेलुगू साहित्या’चीदेखील दखल घेतली गेली नाही, अशी तक्रार आहे. या तक्रारी राहतीलच. त्याचं कारण प्रमुख प्रवाहातले ‘कथित घटक’ अन्य उपप्रवाहांकडे उपेक्षेने पाहतात, असं जाणकारांनी नोंदवलं आहे. दलित-ग्रामीण साहित्याचे प्रवाह मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्यासाठी वाट पाहावी लागलेली आहेत. पण जात-धर्माच्या पलीकडे माणूस आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्याचं दुःख आणि त्याच्या वेदना अस्तित्वात आहेत, या वास्तवाकडे करुणाप्रेरित दृष्टीने पाहण्याची गरज असते. स्कैबाबांकडे ही करुणादृष्टी आहे, म्हणून त्यांना सामान्य माणूस ‘शोधावा’सा वाटतो.
- भारत सासणे
या कथा ग्रामीण आणि लहान शहरांतील भारतीय मुस्लीम समाजाचे जीवन वास्तव दाखवतात, आणि अशा कथा यापूर्वी कुठे वाचायला मिळाल्या नाहीत, असे अनेकांनी नमूद केले आहे. मुस्लीम समस्या आणि संस्कृतीचा स्पर्श कथांमध्ये असल्यानं त्यांचे वेगळे महत्त्व आहे.
- शेख यूसुफ बाबा उर्फ स्कैबाबा"

