‘शिवराय आणि संविधान’ ही अॅड. राहुल रासवे यांनी लिहिलेली लघुकादंबरी आहे. शिवकाळातील विविध प्रसंगांच्या आधारे त्यांनी छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान यांच्यातील एक अदृश्य प्रेरणादायी पदर उलगडून दाखवला आहे. शिवकालीन राज्यकारभार आणि भारतीय संविधानातील तरतुदी यांच्यातील समान धागा वाचकांच्या मनावर ठसा उमटवतो. जगातील सर्व धर्म, संत, महापुरुष एकाच पवित्र विचाराने एकत्र आलेले आहेत. हा समान धागा, समान तत्त्वे भारतीय संविधानात एकत्र आलेली दिसतात. लेखकाच्या मते या तत्त्वानुसार वर्तन करणे, संवेदनशील होणे, त्यानुसार जगणे हेच ‘संविधानशील’ होणे होय. संविधानाशी एकरूप होणे, संविधानाला प्रामाणिकपणे आत्मसात करणे हे देशाच्या विकासामध्ये मौलिक आहे. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ या उक्तीप्रमाणे शिवचरित्र, शिवविचार घराघरांत पोहोचले आहेत. भारताचे संविधानही प्रत्येक भारतीयाला तोंडपाठ असावे ही माफक अपेक्षा लेखक व्यक्त करताना दिसतो. जगभरातील प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक राज्यपद्धतीमध्ये लोककल्याणकारी राज्यपद्धती संविधानाच्या माध्यमातून आजही २१व्या शतकात प्रभावीपणे मांडली जात आहे. १७व्या शतकात होऊन गेलेल्या आदर्श राजा शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंगांना नजरेसमोर ठेवत कथानक गुंफले आहे. न्याय, समानता, बंधुता प्रस्थापित करणारे लोकांनी, लोकांचे लोकांसाठी चालविलेले राज्य शिवरायांना तेव्हाही अपेक्षित होते. रयतेचे राज्य म्हणजेच कल्याणकारी राज्य. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य आणि भारतीय संविधान यांच्यातील नात्याची रंजक अशी गोष्ट म्हणजे ही लघुकादंबरी होय.
डॉ. सहदेव चव्हाण
डॉ. विकास बहुले

