या नोंदी आहेत इतिहास घडविणार्या मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या ! मराठे म्हणजे कोण? तर ज्यांनी आपले हित, स्वार्थ बाजूस ठेवून मराठीराज्य स्थापन व्हावे, एवढेच नव्हे तर ते सतत वृद्धिंगत होत राहिले पाहिजे असा हट्ट आणि निग्रह पिढ्यान्पिढ्या जपला आणि ज्यांनी आपल्या बलिदानानं भगव्या झेंड्याचा रंग अधिकच गडद केला, त्या विविध जातिजमाती, पोटजातीतील समशेर बहाद्दरांनी, कलमबहाद्दरांनी आणि प्रशासकांनी आपल्या शौर्य, धैर्य, मुत्सद्दीपणाचा श्रेष्ठतम आदर्श भावी पिढ्यांसाठी निर्माण केला ते मराठे. स्वराज्याच्या मार्गावरील सराटे दूर सारण्यासाठी झगडले ते मराठे ! पण ही आहेत हिमनगाची केवळ शिखरे ! कारण या २००-२५० वर्षांच्या काळात असे असंख्य वीरवर होऊन गेले की ज्यांची नावेही इतिहासाला ज्ञात नाहीत. कर्तव्य पार पाडून जे काळाच्या पडद्याआड गेले, त्या सार्यांची स्मृती म्हणजेच हा ग्रंथ.
१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणला गेला. त्याला आता पन्नास वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना वाहिलेली ही अक्षर श्रद्धांजली !